“जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : खेड व नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा जनतेच्या प्रेमामुळे खासदारकीची संधी मिळाली. या १५ वर्षांच्या काळात जनतेचे प्रश्न लोकसभेत सोडविण्यासाठी वेळ दिला. मतदारसंघात वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनसंपर्क ठेऊन जनतेची कामे केलीत. स्वत: उद्योजक असल्याने अमेरिकेत राहून व्यवसाय बघत आयुष्य व्यतीत करू शकलो. परंतु जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारण करीत राहिलो. असे विधान शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
हेही वाचा –खासदार बारणे यांच्या ‘हॅटट्रिक’चा खोपोलीतील महायुती कार्यकर्त्यांचा निर्धार
आढळरावांना महायुतीकडू न शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केलीय. यातच पुढे बोलतांना ते म्हणाले की, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पुणे-नाशिक रस्ता, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आदी कामे मी दृष्टीपथात ठेवली होती. मात्र ५ वर्षात काय झाले हे जनतेने अनुभवले आहे. शेतकरी, कामगार, असंघटीत कामगार,, बेरोजगारी, उद्योग व्यवसायासंदर्भात विक्रमी प्रश्न संसेदत मांडले.मतदारसंघात भरीव निधी आणला. अशावेळी मागील पाच वर्षात काय काम झाले ? असा सवाल करत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला.
तर फक्त आवेशात संसदेत भाषणे करायची, भाषणांची मोदींना भुरळ पडल्याचे सांगायचे. राष्ट्रवादीशी एकनिष्ठता सांगता आणि मग शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत जाता तसेच खासदारकी मिळण्यासाठी भाजपला पाच वर्षे डोळे कोण मारत होते. अशी टिकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर यावेळी केली.