ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा पुन्हा अपेक्षाभंग!
शिरुर लोकसभा मतदार संघातून पक्षाकडून संधी नाही? : आढावा बैठकीनंतर लांडे समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता
पुणे । विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘शड्डू’ ठोकलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातब्बर नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भावी खासदार’ अशी जोरदार ब्रँडिंग केल्यानंतर, शिरुरची जागा विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीच लढवावी, असा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे.
या आढावा बैठकीला विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे,आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते? याबाबत उत्सुकता होती.
मागील काही दिवसांपासून डॉ. अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विलास लांडे शिरुरच्या उमेदवारीवर दावा करणार होते. दि. १ जून रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भावी खासदार… अशा आशयाचे फ्लेक्स उभारण्यात आले.
विशेष म्हणजे, शिरुरच्या उमेदवारीबाबत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार निर्णय घेतील. पण, पक्षाने संधी दिल्यास ही निवडणूक लढवणार आणि जिंकणारसुद्धा…’’ असा दावा जाहीरपणे माजी आमदार विलास लांडे यांनी केला होता. त्यामुळे शिरुरच्या जागेवरुन कुणाला संधी मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
डॉ. अमोल कोल्हे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार…
या बैठकीनंतर शिरुर लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार असलेले माजी आमदार विलास लांडे म्हणाले की,शिरुर लोकसभा मतदार संघातील आढावा शरद पवार यांनी जाणून घेतला.त्यावेळी अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरुरमधून निवडणूक लढवावी लागेल, असे आदेश दिले असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे.
लांडे समर्थकांची अन्यायग्रस्त मानसिकता…
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून २०१४ च्या निवडणुकीपासून विलास लांडे यांना ‘साईड ट्राईक’ केले जात आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये लांडे यांना महत्त्वाच्या पदावर संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत लांडे यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरुन अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात एखाद्या चांगल्या मंडळावर संधी मिळण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाकडून संधी दिली जाईल, असा दावा केला जात होता. मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून लांडे यांच्या अपेक्षांचा कायम भंग केला. त्यामुळे लांडे समर्थकांची भावना अन्यायग्रस्त झाली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.