फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार
मुंबई – सध्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा गरम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रार केली होती. त्यामुळे राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी हा वाद आणखी वाढत चालला आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारपुढे आणखी एक चिंता उभी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या एका निर्णयाला राज्यपालांनी केराची टोपली दाखवली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विशेषज्ञ या दर्जाची एकूण 270 पदांची भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षांसाठी वगळून ही पदे थेट निवड मंडळामार्फत भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी या प्रस्तावास नकार दिला आहे.
आरोग्य विभागात 270 पदांची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मंत्रीमंडळाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात निवडणूका लागल्या. त्यावेळी आचारसंहितेच्या काळात यावर काहीच प्रक्रिया झाली नाही. ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर काही काळातच कोरोनाने थैमान घातलं. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यानंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे हा प्रस्ताव मंजुरीस आला होता, तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला आहे.
दरम्यान, राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता त्यामधील 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. आता राज्यपालांच्या निर्णयामुळे राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.