महायुतीकडून उद्या पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन!
नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील गुरुवारी (25 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल आहेत. याचबरोबर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानुसार उद्या महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.
शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या २९ एप्रिल संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपुर्वी नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीची आज पुण्यात बैठक पार पडली.
महायुतीची बैठक संपल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. यापुढे आता प्रचाराची पद्धत काय असावी, तसेच उद्या शिरूरसह पुण्याचे उमेदवार मुरलिधर मोहोळ यांच्यासह सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत. त्याच अनुषंगाने आज बैठक पार पडली. तसेच यापुढे आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचाराची पद्धत काय असावी यासंदर्भात बैठकीत चर्चा केल्याची माहिती आढळराव पाटलांनी दिली.
तर गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघाची परिस्थिती पाहता सगळ्याच मतदारसंघातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करीत आहेत. यातच आता मनसेचा देखील समावेश झाल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. तर उद्या सकाळी आम्ही उमेदवारी अर्ज सादर करणार आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार असल्याचे आढळरावांनी सांगितलंय.
आढळरावांनी यावेळी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील टिकास्त्र सोडलं. गेले अनेक दिवस पाहतोय की, विद्यमान खासदाराला गावाच्या वेशीवरून हाकललं जात आहे. आमच्या गावातल्या सरपंचाच देखील त्यांनी फोन उचलला नाहीय. त्यांनी तर २२ निवेदन दिलीत पण त्यावर एकावरही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना गावाच्या बाहेर हाकलून लावण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढत आहे. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंवर जहरी टिका केली.
दरम्यान, निवडून आल्यानंतर लोकांची कामे करायची नाहीत. नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्टिवेशन प्रचार करायचा. एक आभासी वातावरण निर्माण करायचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं नाही. फक्त लोकांच्या जीवावर निवडून यायचं. काम करायची नाहीत. परंतु जनता आता भोळी नाही आहे. जनतेला सगळं कळतंय. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंवर जोरदार घणाघात केला.