गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच राज्यातली ३६ धरणं ओव्हरफ्लो; मराठवाड्यातल्या धरणांत ९५ टक्के पाणीसाठा
![For the first time in the last several years, 36 dams in the state overflowed; 95% water storage in dams in Marathwada](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Jayakwadi-dam.jpg)
बीड |
गुलाब चक्रीवादळाने राज्यात थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळप्रवण भागात दिसून आला. साधारण ११ लाख हेक्टर शेतजमीन या वादळामुळे उध्वस्त झाली असून उभी पिकं नष्ट झाली आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसामुळे राज्यातल्या ३६ हून अधिक धरणांमधला पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या कित्येक वर्षांतली ही पहिली वेळ आहे, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरणांतला पाणीसाठा १०० टक्क्यांवर गेला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या ३ हजार २६७ धरणांमधला पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. कोकण विभाग ९५.०५ टक्के, अमरावती ८५.०३ टक्के, औरंगाबाद विभाग ७६.१२ टक्के, नागपूर विभाग ७८.१८ टक्के, नाशिक ८०.४३ टक्के, पुणे ८७.७५ टक्के असा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तर मराठवाड्यातल्या धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.
धरणांमधल्या पाणीसाठ्यामुळे येत्या उन्हाळ्यातली पाण्याची समस्या जरी सुटली असली, तरी गुलाब चक्रीवादळामुळे पिकांसह मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रावर एकानंतर एक चक्रीवादळाची संकटं येतच आहेत. आधी निसर्ग, मग तौते आणि आता गुलाब चक्रीवादळ. आम्ही अजूनही निसर्ग आणि तौते वादळाने झालेल्या हानीची नुकसान भरपाई देत आहोत. आणि आता विदर्भ-मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मराठवाड्यातल्या १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे”. वडेट्टीवार पुढे म्हणाले, “आम्हाला असं वाटतं की केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या राज्यातल्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन राज्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”.