breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरे आणि के चंद्रशेखर राव भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मी मुख्यमंत्री असतानाही…”

मुंबई |

महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपाा सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान या भेटीवर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीवर बोलणं टाळलं. ते म्हणाले की, “मी पत्रकार परिषद ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटणे यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असतानाही तेलंगणचे मुख्यमंत्री भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे याच्यात फार काही वाटत नाही”.

भाजपाच्या विरोधाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असं यावेळी सांगण्यात आल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही”. “खरं म्हणजे तेलंगणात आता टीआरएसची स्थितीच वाईट आहे. मागील लोकसभेत भाजपाच्या चार जागा निवडून आल्या, पुढील लोकसभेत तेलंगणात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल,” असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. राणेंच्या मुंबईतील बंगल्यावरील कारवाईसंबंधी विचारलं असता उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “जे सुडाचं राजकारण सरकारला करायचं असेल ते करेल. न्यायालय आहेत ते योग्य तो निर्णय घेतील”. दरम्यान शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राणेंवर, त्यांच्या मुलांवर होणारी कारवाई, किरीट सोमय्यांचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, रवी राणा या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे हे माहिती आहे. त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातू बाहेर येत आहे”.

  • केंद्र सरकारविरोधात रणशिंग ; समविचारी पक्षांना एकत्र करण्याचा उद्धव ठाकरे, राव यांचा निर्धार

बदल ही काळाची गरज असल्याचे मतही उभय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जुलमाच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी या वेळी केले. देशात बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. थोडा वेळ लागेल, पण सारे संघटित होतील आणि चित्र बदलेल. ही लढाई लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आहे, असे राव म्हणाल़े

देशासमोरील मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांची निंदानालस्ती आणि बदनामी करण्याचाच प्रयत्न केला जातो. सुडाचे राजकारण हे हिंदूत्व किंवा भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही, असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला. सध्याची परिस्थिती बघितल्यावर देशाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तरुण वर्गाला आपण काय संदेश देत आहोत, असा सवालही ठाकरे यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्व विषयांचा ऊहापोह करण्यात आला आणि भविष्यातील बदलासाठी आजपासून सुरुवात करीत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत जुलमी राजवटीच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा लढा यशस्वी होतो, असे सांगत परिवर्तनाच्या या लढाईचे परिणाम नक्कीच चांगले दिसतील, असा विश्वास व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button