अजित पवारांच्या छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते वक्तव्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर
![Fadnavis' response to Ajit Pawar's Chhatrapati Sambhaji Raje was not a religious hero](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/devendra-fadnavis-and-ajit-pawar-780x470.jpg)
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते
मुंबई : नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली. यावेळी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहं. यावरून राज्यात राजकीय वाद निर्माण सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिलं आहे.
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर…धर्मवीर…उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, अशी भूमिका अजित पवार यांनी विधानसभेत बोलत असताना मांडली होती.