शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश, फडणवीसांचा घणाघाती आरोप
![शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश, फडणवीसांचा घणाघाती आरोप](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/शिवसेनेच्या-नेतृत्त्वात-संभाजीनगरात-पाण्याचा-सत्यानाश-फडणवीसांचा-घणाघाती-आरोप.jpg)
औरंगाबाद: पाण्याच्या समस्येसाठी भाजपकडून आज औरंगाबादेत महाविकास आघीडीविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात हा जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ओरंगाबादेत पोहोचले आहेत. येथे त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश झालाय आणि त्याची फळं आता इथली लोक भोगत आहेत, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
इथे पाणीच नाहीये, लोकांना त्रास सहन करावा लागतोय – फडणवीस
“सतत इतके वर्ष सातत्याने महानगर पालिकेची सत्ता गाजवूनही संभाजीनगरात पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या नेतृत्त्वात झालाय, त्याची फळं संभाजीनगरची लोक भोगत आहेत. इथे पाणीच नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि १६०० कोटी रुपये दिले. त्या योजनेत बदल करुन ६०० कोटी महापालिकेने द्यावे, असा निर्णय या सरकारने केला. इथे महापालिकेकडे पगार द्यायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
पाण्याची समस्या सुटेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार – फडणवीस
“केंद्र सरकारने दिलेले पैसेच या योजनेत वळवले आहेत. योजनेचा ठेकेदार कामही करत नाही. अर्धा किलोमीटरही काम झालेलं नाही. ४० किलोमीटर काम करायचं आहे. ज्या वेगाने काम चाललंय त्या वेगाने २५ वर्ष लागतील, त्यामुळे भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढत आहोत, प्रचंड प्रतिसाद त्याला आहे, पाण्याची समस्या सुटेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार”, असंही त्यांनी सांगितलं.
“नाना पटोले हे रोज खोटं बोलतात. मनाला येईल ते बोलतात त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. २४/७ पाणी पुरवठ्याचा अवॉर्ड नागपूरला मिळालाय. हे नाना पटोलेंना माहिती नाहीये”, असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली.
भाजपचा जल आक्रोश मोर्चा
औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने औरंगाबादकरांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. महापालिका पाणीप्रश्न हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या वतीने आज महापालिकेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत.