महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने- नवाब मलिक
![Everything that is happening in Maharashtra is done with political revenge - Nawab Malik](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/nawab-malik.jpg)
पुणे |
महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडी मार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, त्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर शरसंधान साधले आहे. तसेच, “ईडी मार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी. परंतु ज्या पध्दतीने भाजपाचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे.” असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.
सुप्रीम कोर्टाने ईडीला आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. तर, या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकारपरिषद घेत, अनिल परब व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूंगात जावं लागेल, असं देखील बोलून दाखवलं. तर, अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच नवाब मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.