‘चाहिए खर्चा तो निकालो मोर्चा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
![Eknath Shinde said that when some people are not settled, they are marching](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Eknath-Shinde-1-4-780x470.jpg)
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा सालियान प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं.
धारावीमध्ये सर्व लोकांना घरे मिळणार आहेत. धारावी प्रकल्प १९ वर्षापासून रखडलेला आहे. टीडीआर हा डिजिटल आहे. टीडीआर विकल्याशिवाय प्रकल्प होणारच नाही. हा प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी आहे. धारावीतील लोक किती दिवस अशा स्थितीत राहणार आहे. काहींची सेटलमेंट झाली नाही की, ते मोर्चा काढत असतात. चाहिए खर्चा तो निकालो मोर्चा, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.
हेही वाचा – ‘स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार’; मंत्री उदय सामंत यांची माहिती
माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी.. जनतेनं फिरावं दारोदारी.. अशा पद्धतीने काम करणारे लोक जनतेचं कसं भलं करू शकतात? रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचं काम देऊन या मंडळींनी आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलं आहे. आरोग्यव्यवस्था चोख आहे असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असं प्रमाणपत्र मिळवलं. ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते. कोविड काळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा या अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरस आहेत, अकल्पित आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. कोण आहे हा? कशासाठी दिलं? गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचं दुकान होतं. कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे सगळे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा? असंही एकनाथ शिंदे म्हणाले.