‘ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण’; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
![Eknath Shinde said reservation for Maratha community without doing injustice to OBC community](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Eknath-Shinde-3-780x470.jpg)
मुंबई | राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झालं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी आपल्याला सर्वानींच सहकार्य केलं. मी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केल्याचं समाधान मला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्या मंत्र्यांचं जे सहकार्य लाभलं त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हेही वाचा – Pimpri Chinchwad | थेरगाव, वाकड परिसरात अशुद्ध आणि दूषित पाणी
महाराष्ट्र विधानमंडळ या वास्तूत अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत. आजही ही वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा भाग होते आहे. ना कुणावर अन्याय असा निर्णय हा आपण घेतो आहे. मुख्यमंत्री असूनही मी आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं. मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल म्हणून मी त्यांना भेटणार नाही असं मी केलेलं नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण करत आंदोलनकर्त्यांना भेटलो. माझ्या पदाचा आब वगैरे काही मी मानला नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काही लोक म्हणाले एकनाथ शिंदेंनी वेळ मारुन नेली, काही जण म्हणाले की एकनाथ शिंदे शब्द पूर्ण करणार नाहीत. पण आम्ही शेतकरी हिताचे, कष्टकरी जनतेचे आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले आहे. कुणालाही शब्द देताना आम्ही आश्वासन पूर्ण करता येईल असेच शब्द आम्ही देतो. माझ्यावर लोकांवर अनेक विश्वास ठेवतात कारण मी दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर लोक विश्वास ठेवतात. एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. मला राजकीय बोलायचं नाही. हा जो निर्णय आहे तो मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काही अनुचित प्रकार आंदोलनांच्या दरम्यान घडले पण ते घडायला नको होते असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.