अब्दुल सत्तारांना दुहेरी धक्का, थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल
![Double blow to Abdul Sattar, complaint lodged directly with CBI and ED](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Abdul-Sattar.jpg)
मुंबई : अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 शेतकऱ्यांची 1400 पानी तक्रार सीबीआयकडे केली होती. हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजला. वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआयकडे तक्रार दाखल झाली आहे. सीबीआयपाठोपाठ ईडीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कथीत गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळ्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाला आहे. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
कृषिमंत्री सत्तारांचा गायरान जमिनीचा घोटाळा
महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.