कोकणात एकही प्रदूषणकारी उद्योग आणणार नाही-देवेंद्र फडणवीस
![Deputy Chief Minister Devendra Fadnavis will present today's incident on the Maharashtra-Karnataka border to Union Home Minister Amit Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Devendra-Fadanvis.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. येथे रिफायनरी येणार असल्याने १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध आहे. रिफायनरी प्रकल्पाला कोकणातून प्रचंड विरोध झाला होता. मात्र, रिफायनरीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. काहीही झालं तरी कोकणात एकही प्रदूषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही. ग्रीन रिफायनरी आणि इमिशन डिस्चार्ज नाही असे नवीन तंत्रज्ञानाचे उद्योगच कोकणात आणू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी कोकणवासीयांना दिलं आहे. स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोकणात येणारी रिफायनरी ग्रीन रिफायनरी असेल. काहीही झालं तरी कोकणात एकही प्रदुषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही. ग्रीन रिफायनरी आणि इमिशन-डिस्चार्ज नाही असे नवीन तंत्रज्ञानाचे उद्योगच कोकणात आणू. याशिवाय त्यांच्यावर एक अट टाकली होती की, जिथं रिफायनरी होईल तिथं त्याच परिसरात ५,००० एकरावर फक्त ग्रीनरी तयार करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख लोकांना थेट रोजगार आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. काही लोकांनी खूपच चुकीच्या गोष्टी पसरवल्या. ते म्हणाले रिफायनरी प्रकल्प झाल्यावर आंबाच येणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“खरंतर आज देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. ती रिफायनरी जामनगरमध्ये असून रिलायन्सची आहे. त्या रिफायनरी परिसरातूनच कोकणाच्या खालोखाल सगळ्यात जास्त आंबा निर्यात होतो. हा आंबा जगभरात जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नको आहे,” असा आरोप त्यांनी केला.