ठाकरेंची युती म्हणजे जणू काही पुतिन-झेलेन्स्कीच एकत्र; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | राज्यातील महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे. या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अखेर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. माझ्यासमोर टीव्ही सुरु होता म्हणून बघत होतो. काही माध्यमं असं दाखवत होती रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. झेलेन्स्की निघाले, पुतिन निघाले आणि युती झाली. मला वाटतं कुठल्याही पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांनी केलं. याने काही फार परिणाम होईल असं वाटत नाही. कारण मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलं आहे. त्यामुळे मराठी माणूस त्यांच्या बरोबर नाही. तर ज्यांच्यावर यांनी हल्ले केले असे अमराठीही यांच्याबरोबर नाहीत. मुंबईत कुणीही यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे.
हेही वाचा : शिवसेना (ठाकरे)–मनसे युतीवर शिक्कामोर्तब; राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा!
भावनिक बोलण्याचा आता जनता विचार करत नाही. मुंबईकर महायुतीचं काम बघून , मुंबईचा विकास बघून मतं देतील. विशेषतः मराठी माणसाला मुंबईत घरं देण्याचा कार्यक्रम महायुतीने सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभे राहतील.
आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यांच्या मनात काय आकडे आहेत? ते कुठे आकडे लावत आहेत? मला माहीत नाही त्यात मला रसही नाही. ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली आणि जो हाईप तयार केला होता खोदा पहाड और चुहाँ भी नहीं निकला. त्यांनी (ठाकरे बंधू) लक्षात ठेवावं ते म्हणजे मुंबई नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे सगळं काही असा जो त्यांचा गर्व आहे त्यामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेलेत. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट बदलली पाहिजे. अनेक वर्षे एकच गोष्ट बोलत आहेत. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल पण ते बोलणार नाहीत, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती म्हणजे भीती संगम आहे हा प्रीतम संगम नाही. शिवाय व्हिडीओ काहीही बनवूदेत. अख्ख्या जगाला माहीत आहे देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वातच जगतो आहे आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.




