शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात येतंयः सुषमा अंधारे
![Devendra Fadnavis is plotting to put four ministers of Shinde group in trouble: Sushma Andhare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Sushma-Andhare-1.png)
मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात येतंय, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सोलापुरातील महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, 83 कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला?, आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीत चारही मंत्री अडचणीत आले आहेत. ज्या चार मंत्र्यांवर आरोप करण्यात आलेत ते चारही मंत्री शिंदे गटातील आहेत. टीम भाजपा पद्धतशीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडचणीत आणत आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
दहा दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. बावनकुळे म्हणाले होते की, फडणवीसांना आम्हाला मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे. त्यामुळे हे पद्धतशीरपणे कटकारस्थान पूर्णत्वास नेलं जात आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एकीकडे चर्चेची राळ उडवून देताना दुसरीकडे षडयंत्र आखायचं. अशा प्रकारची निती देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यासाठी त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
देवेंद्र फडणवीस फार अभ्यासू नेते आहेत. त्यांच्याकडून मला अभ्यासू प्रतिक्रिया अपेक्षित आहे. मी फुले, शाहू, आंबेडकर, कबीर अशा विचारधारेतून आलेली मुलगी आहे. माझ्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना आक्षेप आहे. त्यांना जर खरच या गोष्टींवर आक्षेप असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे आणि ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारची ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करते. या समित्यांच्या अखत्यारित ज्या ग्रंथ संपदेचा आणि साहित्याचा समावेश होतो. हे सर्व साहित्य खोटं आहे असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणतील का?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.