एकनाथ खडसेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले; म्हणाले…
तुम्ही चार गोष्टी तिकडून मांडल्या तर आम्ही ५० गोष्टी बोलू आमच्याकडे शब्द नाहीत, असं नाही
नागपूर :
बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. पण राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेलं पाहायला मिळालं.
सीमाप्रश्नी मंजूर करण्यात आलेला ठराव फार मिळमिळीत आहे. कर्नाटक महाराष्ट्राविरोधात आक्रमकपणे आव्हानात्मक भाषा करत आहे. पण, महाराष्ट्राच्या ठरावामध्ये फक्त तुम्हाला समज देतो, असं सांगितलं आहे, असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. सोबतच खडसेंनी विधापरिषदेत ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर याला ‘मिळमिळीत’ असा उल्लेख केला.
एकनाथ खडसेंच्या प्रश्नाला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना चांगलच खडसावल्याचं पाहायला मिळालं. एकतर आपण एकमताने ठराव मंजूर करून परत त्याच्यावर चर्चा करतो. चार गोष्टी तिकडून मांडल्या तर आम्ही ५० गोष्टी बोलू शकतो. आमच्याकडे शब्द नाहीत, असं नाही. तिथे कर्नाटक एक आहे, तर आपलं सभागृह एक होऊ शकत नाही का? काहीतरी गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सोबतच, कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच आणि इंच जागा महाराष्ट्राचीच आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंभीरपणे निर्धाराने व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव आज दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.