रेल्वे प्रवास, उपाहारगृहांबाबत पुढील आठवड्यात निर्णय
![Decision next week on train travel, restaurants](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/cm-uddhav-thackeray-1.png)
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत
मुंबई |
करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी सावधगिरी बाळगून शिथिलतेबाबत निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट करत उपाहारगृहांना व उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत पुढील आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. बेस्टच्या ७४ व्या दिनानिमित्त पुनर्विकसित माहीम बसस्थानकाचे लोकार्पण, १२ मीटर्स लांबीच्या विद्युत बसगाड्या, नवीन वातानुकूलित बस मार्ग तसेच २४ इतर गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते माहीम पश्चिाम बसस्थानक येथील कार्यक्रमात झाले. महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलत आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करत आहोत. कालच हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक भेटून गेले. त्यांना वेळ वाढवून हवी आहे. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. करोना उलटणार तर नाही ना हेही पाहावे लागणार आहे, असे सांगत पुढील आठवड्यात आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संके त ठाकरे यांनी दिले. सन १८७४ ते २०२१ हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रिक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. विद्युत बस प्रदूषण न करणारी व पर्यावरणपूरक बस आहे. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.