‘काही लोक मिशी आणि दाढीवर बोट फिरवत उसने अवसान आणतात, पण..’; सामनातून संभाजी भिंडेवर हल्लाबोल
![Criticism of Sambhaji Bhide from the match, which is the mouthpiece of Uddhav Thackeray's party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/sambhaji-bhide-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, जवाहरलाल नेहरू आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. भिडे यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे.
सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. अत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरूजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
मणिपूर, हरियाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरूजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे. पण, महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल? अशी अप्रत्यक्षपणे टीका संभाजी भिडे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – 1000 मध्ये बनावट कागदपत्रे, कोणी जावई तर कोणी अरबी शिक्षक.. बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे सुरक्षा धोक्यात
वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेखhttps://t.co/5vGW50iYjg
— Saamana (@SaamanaOnline) August 5, 2023
मणिपुरात हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उपवस्त्रांनी आता हरयाणातही हिंसा भडकवून अनेकांचे बळी घेतले, मालमत्तेचे नुकसान केले. दहशतीचे वातावरण निर्माण केले. हरियाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी तयारी झाल्याची माहिती आहे. हरियाणा व राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होतील. त्याची ही पूर्वतयारी दिसते. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरड्या भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे, असंही सामनातून म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसांची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे. महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यांवर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे, अशी टाका सामनातून छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.