‘तुरुंगातील गुन्हेगाराचा गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार’; जयंत पाटील
मुंबई : ‘सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्यांचा कधी संबंध आला नाही. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. ज्यांच्यावर दोन-दोन खुनाचे आरोप आहेत, अशा व्यक्ती मुलाखती देत आहेत. तुरुंगातील गुन्हेगाराचा गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे,’ असा उलटवार राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. तसेच आपणाला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाझे याने दिलेल्या मुलाखतीवर बोलताना आ. पाटील म्हणाले, ‘‘दोन वर्षे माणूस शांत असतो. अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते, हा काही योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खुश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहिते, कुणाच्या सांगण्यावरून लिहितंय, हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. जनता त्याला योग्य ते उत्तर देईल’’, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘आमचा विरोध कुठल्याही जातीला किंवा धर्माला नाही’; देवेंद्र फडणवीस
सचिन वाझेला प्रवक्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल. एवढ्या खालच्या पातळीवर जावू नका एवढीच त्यांना सूचना असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे आ. पाटील यांनी भाजपला इशारा दिला.वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्र व्यवहार सुरू आहे हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत. वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात काही गंभीर असेल, तर फडणवीस मला सांगतील, अशी टिपणीही त्यांनी केली.