#CoronaVirus: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले, मागच्या दारानं जाण्यात रस नाही
करोना आणि लॉकडाउनमुळे राज्य ठप्प झालं आहे. महाराष्ट्रासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. अस असताना दुसरीकडे राजकीय अस्थिरतेच ढग दिसू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं मंजूर करून राज्यपालांना पाठवण्यात आला. त्याचबरोबर दुसऱ्यांदा राज्यपालांना कार्यवाही करण्याची विनंतीही केली आहे. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, यामागे भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे.
राज्यात करोनाबरोबर राजकारणही शिगेला पोहोचलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधीमंडळ सदस्यत्व होण्याचा कालावधी जवळ येऊ लागला आहे. विधान परिषदेच्या निवडणूका रद्द झाल्यानं सरकारनं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आला. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, भाजपाकडून राज भवनाच्या माध्यमातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. “मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारशीवर राज्यपाल कायदा आणि घटनेच्या चौकटीत योग्य तो निर्णय घेतील, याचा मला विश्वास आहे. मला आवर्जून सांगावंस वाटत की, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आल्याचं आणि भविष्यातही मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना पाहून भाजपाला आनंदच होईल. भाजपाला राज्यात अस्थिरता नको आहे. राज्यात अस्थिरता आणण्यात आणि मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपाला कसलाही रस नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांना उत्तर देताना सांगितलं.