TOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना सुचवले उपाय

नवी दिल्ली – देशात कोरोना  रुग्णसंख्या झपाट्याने वाढत जातेय. आज अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा वाढत जात आहे. त्यामुळे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आङे. या पत्रात त्यांनी काही उपायही सुचवले आहेत.

आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं, लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या 6 महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील.

लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण

मनमोहन सिंग यांनी सुचवले की, कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिले पाहिजे.

राज्यांना अधिकार द्या

केंद्र सरकारने सर्व राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची श्रेणी निश्चित करण्याची सूट द्यायला हवी. जेणेकरुन अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सला सुद्धा लस मिळेल जे 45 वर्षांहून कमी वयाचे आहेत आणि ज्यांना राज्य सरकारने फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीत समावेश केलं आहे.

लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मदत

मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं की, जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्याचे मी कौतुक करतो. लस उत्पादक कंपन्यांना सरकारने आवश्यक निधी आणि इतर सहाय्य पुरवावे जेणेकरुन लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू राहिल. अशा परिस्थितीत कायद्यातही आवश्यक परवान्यांची तरतूद आणली पाहिजे जेणेकरुन अधिकाधिक कंपन्यांना परवाना मिळेल आणि लस निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल.

लस आयात करता येईल

मनमोहन सिंग यांनी शेवटचा उपाय सांगत म्हटले की, सध्या देशात लस पुरवठा मर्यादित होत आहे. अशा परिस्थितीत जर जगातील इतर विश्वसनीय लसीला मंजूरी मिळाली असेल तर ती लस आपण आयात करायला हवी. आपण भारतात त्याची चाचणीशिवाय असे करु शकतो. यावेळी भारत आपत्कालीन परिस्थितीत आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग करताना देशात त्याची चाचणी सुद्धा करता येऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button