काँग्रेसचा मोदी सरकारला टोला ः …भारत जोडो यात्रेपासून भाजपा किती घाबरलीय हे दिसते…
![Rahul Gandhi-Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Rahul-Gandhi-Narendra-Modi-768x470.png)
मुंबई : चीनसह देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा होऊ लागल्याने केंद्र सरकार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्राद्वारे ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल सल्ला दिला आहे. मात्र, यावरून भारत जोडो यात्रेपासून भाजपा किती घाबरलीय हे दिसते, असा टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे.
चीनसह जगातील अनेक देशांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विविध देशांमध्ये आठवड्याभरात कोरोनाचे तब्बल 36,32,109 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये तर कोरोनाच्या रुग्णांबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज, बुधवारी देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड-19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
याशिवाय, केंद्रीय मंत्री मनुख मांडविया यांनी एका पत्राद्वारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि मास्क-सॅनिटायझरचा वापर करावा. या यात्रेत लसीकरण झालेल्या नागरिकांनाच सहभागी करून घ्यावे, असे सांगतानाच हे नियम पाळण्यात काही अडचण आल्यास लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन देशहितासाठी ही यात्रा काही काळ पुढे ढकलली जाऊ शकते, असा सल्लाही मांडविया यांनी दिला आहे.
यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजपावर पलटवार केला आहे. या पत्रावरून भारत जोड़ो यात्रेपासून भाजप किती घाबरली आहे, हे दिसते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता, असे सचिन सावंत यांनी सुनावले आहे.
मोदीजींनी गुजरातमध्ये 51 किमीचा रोड शो केला तेव्हा, हे मनसुख मांडविय मांडी घालत, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते. कोरोनामध्ये राहुल गांधींच्या इशाऱ्यानंतरही एक मंत्री ‘हर्ष’वर्धन करित बसले, आता आणखी एक मोदींना मनसुख देण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रा योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.