“छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तयार केले,” आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर
मुंबई |
राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या वक्तव्यावर नाराजी जाहीर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “अहो साहेब व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तयार केले”.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला: चंद्रकांत पाटील
अहो साहेब छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तय्यार केले व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी#जय_शिवराय— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 15, 2021
- चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले…
“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 14, 2021
- संजय राऊतांची प्रतिक्रिया…
“देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार सर्वात प्रथम या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोणी कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय प्राप्त करतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमंच हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात ते आहेत,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.