‘पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं’; छगन भुजबळ यांचं विधान
![Chhagan Bhujbal said that the early morning swearing-in ceremony was not Ajit Pawar's rebellion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
मुंबई : २०१९ साली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला. या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार यांनी गौप्यस्फोट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. अजित पवारांनी ते बंड केलं नव्हतं तर त्यांनी भाजपाला दिलेला शब्द फिरवला, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, २०१९ च्या पहाटेच्या शपथवविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की शरद पवारांनी विश्वासघात केला ते योग्यच आहे. मी शरद पवार यांना गुरु मानतो त्यामुळे मी असं म्हणणार नाही. पण त्यांनी भाजपाला २०१९ मध्ये डिच केलं. शरद पवारांनी शब्द दिला होता म्हणून शिवसेनेची साथ सोडली. शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी झाली होती. मात्र नंतर जाऊन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगितलं होतं की मला भाजपाबरोबर जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की विश्वासघात केला. ते तसं म्हणू शकतात. मी हे म्हणतोय की शरद पवारांनी भाजपाला डिच केलं.
हेही वाचा – बिहारमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १०० प्रवासी जखमी
अजित पवारांनी २०१९ मध्ये पहाटेचा जो शपथविधी केला ते काही बंड नव्हतं. त्यांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला. शरद पवारांनी तो शब्द फिरवला. आम्ही त्यांच्या बरोबर गेलेले जे आमदार होते त्यांनाही परत आणलं. पहाटेचा शपथविधीला शरद पवारांची संमती नव्हती. पण त्या दरम्यान घडलं असं की शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी नेहरू सेंटरमध्ये शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थोडा वाद झाले. शरद पवार त्यावेळी रागाने बाहेर पडले. ती संधी साधून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क केला. रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवली गेली. शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपाला जो शब्द दिला होता ते शब्द अजित पवारांनी पाळला, शरद पवार फिरले. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यामुळे २०१९ ला जो पहाटेचा शपथविधी झाला त्याला बंड म्हणताच येणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
कोर्टाने हात दाखवून मतदान करायला सांगितलं. गुप्त मतदान झालं असतं तर अजित पवार आणि फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. तसंच अजित पवारांबरोबर जे आमदार गेले होते ते परत आले. त्यांना प्रतिभा पवार म्हणजेच शरद पवार यांच्या पत्नी अजित पवारांना भेटल्या. त्यांनीही अजित पवारांना परत येण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद सोडलं. कोर्टाचा निर्णय, प्रतिभा पवारांचा शब्द यामुळे अजित पवार परतले, असंही छगन भुजबळ म्हणाले.