‘मनोज जरांगे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’; छगन भुजबळांचा आरोप
मुंबई | नाभिकांनी मराठ्यांच्या दाढ्या करू नये, केस कापू नये असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. भुजबळांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ अशी वक्तव्ये करत राहिले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ते निवडून येणार नाहीत, असं जरांगे म्हणाले. यावरून छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत भुजबळ म्हणाले, त्या जरांगेला जाऊन सांगा, तू आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहा आणि निवडून येऊन दाखव. तू आधी नीट उभा राहा मग बोल. मी २५ वर्षे मुंबई महापालिकेत होतो. दोन वेळा मुंबईचा महापौर झालो आहे. तसेच दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यानंतर चार वेळा येवल्यातून आमदार म्हणून निवडून आलो. उगीच काहीही वक्तव्ये करू नको.
हेही वाचा – ‘हिंदू देवतांचा अपमान पुणेकर खपवून घेणार नाहीत’; सुनील देवधर
मनोज जरांगे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यात फूट पाडण्यासाठी काहीही वक्तव्ये करतो. कधी म्हणतो मी धनगरांची बाजू लढणार, तर कधी नाभिकांच्या बाजूने लढणार. परंतु, तू आणि तुझे सहकारी आमच्या आरक्षणावर डल्ला मारताय ते आधी थांबव. तू आमच्या आरक्षणावर डल्ला मारणं थांबवलंस, ओबीसी समाजातून आरक्षण घेण्यासाठी चालवलेला प्रयत्न थांबवलास तर तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. तू तुझी मागणी मागे घे, तसं केल्यास ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल, असंही छगन भुजबळ म्हणाले.