चंद्रकांत खैरेंची शिंदे गटावर आगपाखड; ‘धनुष्यबाण’वर मांडली भूमिका!
![Chandrakant Khairen's attack on Shinde group; The role presented on 'Dhanushyabaan'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-07-at-3.44.44-PM-780x470.jpeg)
औरंगाबाद ।
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडी थंडावत असताना आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीचं राजकारण तापू लागलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेकडून आयोगासमोर प्रतित्रापत्र सादर करण्यात येत असून त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र, सुनावणीआधीच दोन्ही बाजूंनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असे दावे करण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे.
“धनुष्यबाण आमचं लकी चिन्ह”
शिवसेनेचा इतिहास सांगताना चंद्रकांत खैरेंनी धनुष्यबाण हे पक्षाचं लकी चिन्ह असल्याचं म्हटलं आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. १९६८ला पालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत ४२ नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून आले. तेव्हापासून धनुष्यपबाण चिन्ह हे आमचं लकी चिन्ह आहे”, असं खैरे म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून एकनाथ शिंदे पक्षाध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं पत्रकारांनी विचारलं असतान खैरेंनी खोचक शब्दांत शिंदेंना लक्ष्य केलं. “हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानपदाचीही स्वप्नं ते पाहतील. मग देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी काय करणार?” असा खोचक सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
“एकनाथ शिंदे आधी नगरसेवक झाले, नंतर सभागृहनेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजपा युतीमध्ये त्यांना चांगली खातीही दिली. त्यांना नगरविकास खातंही दिलं. मुख्यमंत्र्यांकडचं खातं त्यांना देण्यात आलं. एवढं झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा खूपच आहे आणि त्यासाठी त्यांना फोडाफोडी करायची आहे”, असं खैरे म्हणाले.
“शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीसाठी तयार”
“हे फक्त पैशाच्या जोरावर संघटना फोडायला निघाले आहेत. यांना काही वाटत नाही का? सगळं मला मिळावं असं करू नये. एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं अघोरीपणा करू नये असं माझं शिंदेंना सांगणं आहे.अजून शिवसैनिक शांत आहेत. शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहेत. पण तुम्ही काहीही करायला लागलात, तर राग येणार नाही का?”, असा उद्विग्न सवाल चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला.