#CDSBipinRawat: दुर्घटनेवर शंका व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी फटकारलं; म्हणाले “देशाची…”
मुंबई |
तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवर शंका उपस्थित केली असून पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी शंकेचं निरासन केलं पाहिजे असं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून फटकारलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“काही बाबतीत राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. जिथे संरक्षण दलांचे प्रमुख यांचा विषय आहे तिथे अशी वक्तव्यं करण्यापेक्षा, देशाची सर्वोच्च प्राथमिकता अपघात का झाला ही आहे. तिन्ही सैन्यदलांची मिळून समिती तयार करण्यात आली आहे. ती समिती चौकशी करत असून त्याआधी याबद्दल बोलणं अनुचित आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
- संजय राऊत काय म्हणाले आहेत…
संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ते रशियन बनावटचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर होते. बिपिन रावत यांच्यावर देशाने सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या, त्यासंदर्भात ते काम करत होते. चीन आणि पाकिस्तान संदर्भात केलेल्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. बिपिन रावत यांचा अत्यंत सुरक्षित वाहनातून जाताना अपघात होतो तेव्हा देशाच्या मनामध्ये नक्कीच शंका निर्माण होते. सरकार त्यासंदर्भात चौकशी करेलच. पण लोकांच्या मनातील शंकाचे निरासन करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांची आहे”.
“बिपिन रावत यांच्या जाण्याने सरकारसुद्धा गोंधळलेले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये बिपिन रावत हे त्यांचा लष्करी रुबाब बाजूला ठेवून आमच्यासोबत संवाद साधत असत. मला खात्री आहे की काल देशाचे सर्वोच्च नेतृत्वसुद्धा गोंधळले असेल. या घटनेमुळे त्यांच्या मनातसुद्धा काही शंका निर्माण झाल्या असतील,” असे संजय राऊत म्हणाले.
- बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू
जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता) ते निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.
वडिलांचा सार्थ वारसा, गोरखा रायफल्सचा बहाद्दर योद्धा ते संरक्षण दलांचे प्रमुख…असा होता बिपिन रावत यांचा जीवनप्रवास
स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली. हेलिकॉप्टरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. दुर्घटनेआधी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात होते. जमिनीवर कोसळेपर्यंत हेलिकॉप्टरने पेट घेतला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोसळत्या हेलिकॉप्टरमधून आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत दोघांना खाली पडताना पाहिल्याचे पेरूमल या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने सांगितले.