‘काश्मीर फाईल्स’ पहायला गेलेल्या महिलांना भगवी शाल काढायला लावल्यानं भाजपा संतप्त; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘हिरवे तुमचे रक्त…’
![‘काश्मीर फाईल्स’ पहायला गेलेल्या महिलांना भगवी शाल काढायला लावल्यानं भाजपा संतप्त; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘हिरवे तुमचे रक्त…’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/kashmir-files-thakrey.jpg)
मुंबई |
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केलाय तर काही ठिकाणी चित्रपटात अतिशयोक्ती दाखवलं असल्याचं म्हणत टीका देखील होत आहे. राज्यातही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ठाकरे सरकारने ती मागणी मान्य केली नव्हती. त्यावरून टीका करण्याऱ्या विरोधकांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नाशिकमध्ये बुधवारी काही महिला ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना सिनेमागृहात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी भगवी शाल काढण्यास सांगितले होते. यावरून गुरुवारी भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘हेच तुमचे हिंदुत्व आहे का,’ असा सवाल भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. याबाबत त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली.
‘”हिरवे तुमचे रक्त तळपते, लुप्त हिंदुत्व बाणा, जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना’, असा शाब्दिक हल्ला भाजपाने शिवसेनेवर केला. दरम्यान, नाशिक मध्ये, चित्रपटगृहात भगवी शॉल घालून ‘द कश्मीर फाईल’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं! चित्रपटगृहाच्या गेटवर शॉल उतरवून घेण्यात आल्या,” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
'हिरवे तुमचे रक्त तळपते, लुप्त हिंदुत्व बाणा
जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना'नाशिक मध्ये, चित्रपटगृहात भगवी शॉल घालून 'द कश्मीर फाईल' पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं! चित्रपटगृहाच्या गेटवर शॉल उतरवून घेण्यात आल्या.@OfficeofUT जी हेच हिंदुत्व तुमचं? https://t.co/y4ufxzCV8B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 24, 2022
भाजपाकडून यापूर्वीही शिवसेनेचा उल्लेख जनाब सेना म्हणून करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करत भाजपाने उद्धवजी हेच तुमचे हिंदुत्व आहे का?, असा प्रश्न केलाय. तसेच तुमच्या शरीरातील रक्त आता हिरवं झालं असून हिंदुत्वाचा बाणा हरपला असल्याची टीका केली आहे.