जो दारू पितो तो नक्कीच मरतो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचे अजब विधान
पटना । महाईन्यूज ।
बिहारमध्ये बनावट आणि विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ३९ जणांचा दारू पिऊन मृत्यू झाला आहे. तर ४७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजब विधान केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेबाहेर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जो दारू पितो तो नक्कीच मरतो. बिहारमध्ये बनावट दारुमुळे मृत्यू होणे ही नवीन गोष्ट नाही. देशभरातील लोक बनावट दारुमुळे मरतात. विरोधक केवळ दारुच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत, असं नितीश कुमार म्हणाले.
बिहारमध्ये दारुबंदी नसतानाही इतर राज्यात लोक मरायचे. लोकांनी स्वत: सावध राहावे. दारु वाईट आहे. त्यामुळे त्याचे सेवन करु नये. दारुबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारु सोडली, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. विषारी दारु प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच मी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. दोषींना पकडावे आणि दारुचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करावी, असं नितीश कुमार म्हणाले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. गिरीराज सिंह म्हणाले की, हे बिहारचे दुर्दैव आहे. बिहारमध्ये दारु धोरण लागू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण मुख्यमंत्र्यांची सहानुभूती जागृत होत नाही. सभागृहात कोणी आवाज उठवला की, कुणालाही अपेक्षित नव्हते, अशी वागणूक दिली जाते, असं सिंह म्हणाले.