आदित्य ठाकरेंच्या सभेआधीच सावंतवाडी शहरात तसेच सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले झेंडे सभेपूर्वीच काढले
कोकणात राजकीय कुरघोडी; वादाची ठिणगी, वातावरण तापलं
![Before the meeting of Aditya Thackeray, the flags planted in Sawantwadi city and the venue of the meeting were removed before the meeting.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/aditya-Thakre-780x470.jpg)
सिंधुदुर्ग : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात तसेच सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले झेंडे सभेपूर्वीच काढण्यात आले. काही तक्रारी केल्या, त्यामुळे प्रशासनाने सूचना दिल्याने हे झेंडे काढावे लागले, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र त्याआधी वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात तसंच सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले झेंडे सभेपूर्वीच काढण्यात आले. काही तक्रारी केल्या त्यामुळे प्रशासनाने सुचना दिल्याने हे झेंडे काढावे लागले, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकारामागे मंत्री दीपक केसरकरांचा हात आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराजय होणार असल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यातूनच त्यांनी हा रडीचा डाव खेळला, असा आरोप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.
सावंतवाडी शहरातील गांधी चौकात आदित्य ठाकरे यांची सभा आज सायंकाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात भगवे झेंडें लावून शहर भगवामय करण्यात आले होते. मात्र काही विरोधकांकडून परवागनी न घेता हे झेंडे लावण्यात आले, अशा तक्रारी करुन ते झेंडे काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी झेंडे काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे काढून प्रशासनाला सहकार्य केले.
दरम्यान, याबाबत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारामागे मंत्री केसरकर यांचा हात आहे. त्यांनी तब्बल ३ वेळा झेंडे काढण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केला. हा प्रकार योग्य नाही. त्यांच्या सभा झाल्या त्यावेळी परवानगी घेण्यात आली नव्हती. परंतु अशा प्रकारे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रचार करावा, अशा प्रकारे तक्रारी करणे योग्य नाही, असं ते म्हणाले.