‘शेतकऱ्यांच्या बांधावरही प्रभू रामाचं दर्शन झालं असतं’; बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी इतका प्रचार करण्याची काय गरज आहे?
मुंबई : मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाने नुकसान झालेलं असताना शिंदेंनी अयोध्या दौरा केल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांचा राम नथुराम आहे. आमचा राम खरा आहे. प्रभू राम शेतकऱ्यांसोबत आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. तरूण बेरोजगार आहेत. महागाई वाढली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. पण, हे सगळे प्रश्न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर गेले. अशावेळी त्यांना प्रभू रामाने काय आशीर्वाद दिला असेल. अयोध्येत जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी इतका प्रचार करण्याची काय गरज आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाण्यात काँग्रेसचं अस्तित्व नाही, असं नाही. आमचं अस्तित्व जनतेच्या मनात आहे. जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा कळेल की, कुणाचं किती अस्तित्व आहे. आजच्या बैठकीत राज्यासमोर कोणत्या समस्या आहेत. त्याचबरोबर निवडणुकीबद्दलची रणनीती आणि नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेच्या तयारीबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.