नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
![Balasaheb Thorat reacted to Narayan Rane's statement, saying](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/narayan-rane-and-thorat.jpg)
मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथील पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नारायण राणेंच्या विधानावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, राज्यात महाविकासआघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलाताना म्हणाले, “कालची जी घटना आहे, ती आपण पाहिलं तर तशी दुर्दैवी वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात हे आहे की एक संस्कृती आहे, एकामेकांचा सन्मान करण्याची विरोधी पक्षात असलात तरी. टीका हा एक अपरिहार्य भाग असतो, टीका करावी लागते, बोलावं लागतं. परंतु त्याचा स्तर कोणता असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने, नारायण राणे जे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याला टीका देखील म्हणता येत नाही. तिला टीका म्हणणं देखील योग्य नाही. त्यातून त्यांनी जो शब्द वापरला, तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व हे मुख्यमंत्री करत असतात, तो मानबिंदू असतो, अस्मिता असते, कुणीही मुख्यमंत्री असो. त्यांच्याबाबतीत असा शब्द वापरणं तर अतिशय चुकीचं होतं. म्हणून माझ्या मते जे काही घडलंय याबाबत आम्ही निषेध करतो आहोत, त्या वाक्याचा, नारायण राणे यांचा. त्यामुळे त्यांना अखेर कारवाईला सामोरं जावं लागलं.”