‘काका-पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत’; कुणी केली टीका?
![Bacchu kadu said that uncle-nephews are making Maharashtra mad together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Ajit-Pawar-and-Sharad-Pawar-1-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, यावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, शरद पवार बोलतात, तसं करीत नाही, अन् त्यांनी जे बोललं आहे, ते आतापर्यंत कधी केलं नाही. राष्ट्रवादीची आताच्या खेळी बघितली तर डोकं फुटायची वेळ येईल. हा तर मोठा खेळ असू शकतो किंवा गेल असू शकतो. एका बाजूला आघाडीत राहून शरद पवार लढतील अन् युतीत राहून अजित पवार निवडणुका लढतील. अन् दोघांचा संघम होऊन पुन्हा एक आपलाच सागर तयार करू शकतात. काका पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत. ते सुर्याच्या प्रकाशा इतकं सत्य आहे. त्यात प्रश्न विचारण्याची गरज नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा – आगामी लोकसभा निवडणुकीत कोण ठरणार वरचढ? वाचा सविस्तर..
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले.