बच्चू कडू यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, तुमच्या बापाने..
![Bacchu Kadu said that if you can't get it from your father, reduce the cost of production](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Bacchu-Kadu-2-780x470.jpg)
मुंबई : सोलापूरात शासन दिव्यांग्यांच्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बच्चू कडू यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य करताना राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच महिला आरक्षण विधेयकावर आपली भूमिका मांडली.
बच्चू कडू म्हणाले, कायदा हा राजकारणी लोकांच्या हातातलं बाहुलं बनता कामा नये. कायद्याने आम्ही बाहुलं बनले पाहिजेत. आम्ही कायद्याने सैनिक झाले पाहिजेत. तेव्हा काहीतरी रूपांतर होईल. नाहीतर मग ईडीची चौकशी फक्त एकाच पक्षावर होतेय. दुसऱ्या पक्षावर होतच नाही. मुळात मी हे बोलल्याने तुम्ही पुन्हा म्हणाल बच्चू कडू नाराज आहे. अरे पण मग खरं बोलणार तरी कोण?
मुळात राज्य शासनाचा जीआर आहे की ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते. मग हा नियम असताना दुष्काळ वेगळा जाहीर करण्याची गरजच काय? दुष्काळ जाहीर करा. त्यासाठी कमिटी करा. हा रितीरिवाज जुना आहे.पूर्वी 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यावर दुष्काळ जाहीर केला जायचा. मात्र शासनाने तो 33 टक्क्यावर आणला आहे. दुष्काळ जाहीर करा हे शब्द लोकांच्या तोंडात रुजले आहेत. दुष्काळ जाहीर केल्याने कुठे काय होतं? महसूल वगैरे कुठे माफ होतो का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
हेही वाचा – गोप्या नावाचं कुत्रं… भुंकतंय…त्याचा बंदोबस्त करा..!
ऊन, पाऊस जास्त झाला, गारपीट झाली हे नेहमीचे रडगाणे आहे. रोग, कीड, भाव पडले तरीही शेतकऱ्यांना मदत द्यावी लागते. मात्र आमचं सरकारला म्हणणं आहे की ही मदत बंद करा आणि रास्त भाव द्या. हे तुमच्या बापाकडून जमत नसेल तर उत्पादन खर्च कमी करा, असं बच्चू कडू म्हणाले.
उत्पादन खर्च हा कंपनीच्या घशात चालला आहे. पहिले बैल, बंडीसहीत सगळं आमचं होतं. बियाण, खत, औषध आमचं होतं. पण ते सगळं आता कंपनीचं झालं. शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसून कंपन्या मोठ्या होतात. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. आमची जी फार जुनी मागणी आहे, मागच्या २० वर्षांपासून, पेरणी ते कापणीपर्यंतचे सगळे कामं एमआरजीएसमध्ये घ्या. मजुराचा ८० ते ५० टक्के खर्च कमी झाला, तर मग काहीही पडलं तर मदत द्यायची गरज नाही. उत्पादन खर्च कमी होईल, असंही बच्चू कडू म्हणाले.