‘मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल’; बच्चू कडू यांचं विधान
![Bacchu Kadu said that if the six floors of the Ministry are improved, the entire Maharashtra will improve](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Bacchu-Kadu-3-780x470.jpg)
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. मंत्रालयातच पाणी मुरते. हे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, अशी टीका कडू यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले, एवढ्या मोठ्या सात मजली मंत्रालयात काल एका अधिकाऱ्याला झापून आलोय. मंत्रालयाचे सहा मजले जरी सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, पण पाणी मंत्रालयातच मुरते, तिथेच सगळी चिरीमिरी आहे. जिथे आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. बदलीसाठी मंत्रालयात काय काय करावं लागतं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. लय वांदे आहेत. यात बदल आवश्यक आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…
राज्याच्या मंत्रालयात किती भ्रष्टाचार असला तरी दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातून शेकडो दिव्यांग बांधव या अभियानात सहभागी झाले आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.
कोणाचं काम कसं, कुठे आणि कधी फिट करायचं हे मंत्रालयातील बाबू, अधिकारी आणि सचिवांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. अनेकांना हटवण्याचा प्रयत्नही झाला. परंतु मंत्रालयातील विशिष्ट खुर्च्यांचा सातबारा घेऊनच हे अधिकारी, बाबू व सचिव गेल्या अनेक वर्षापासून राज्यकारभार चालवणाऱ्या त्या सहा मजली इमारतीत ठाणा मांडून बसले आहेत. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, परंतु एखादे काम मंत्रालयातून करून घ्यायचे असल्यास ‘लक्ष्मी दर्शन’ केले की कामाच्या फाइल पटापट पुढे सरकतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मंत्रालयात लागलेल्या या भ्रष्टाचाराच्या किडीवर अजूनपर्यंत तरी कायमस्वरूपी ‘पेस्ट कंट्रोल’ करणारे औषध कोणाला सापडलेले नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.