‘भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये’; सचिन तेंडुलकरच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहारचे आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. सचिनने केलेल्या एका जहिरातीवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी देखील केली आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे आता बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत.
बच्चू कडू म्हणाले, सचिन तेंडुलकर यांचे खूप चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे त्याचे परिणाम जनमानसावर पडत आहेत. कुटुंब उद्धवस्त होत आहेत. त्यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करणार आहोत की सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्यावी.
हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : १६९ विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
त्यांनी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न तरी परत करावं. त्यांना भारतरत्न नसतं, तर आम्ही काही बोललो नसतो. पण ते देशाचे भारतरत्न आहेत. १५ दिवसांत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक गणेश मंडळासमोर सचिन तेंडुलकर दानपेटी राहील. त्यातून जेवढा पैसा येईल, तेवढा गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही सचिन तेंडुलकर यांना आणून देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.
या जाहिराती करणारे इतर सेलिब्रिटी हे भारतरत्न नाहीयेत. भारतरत्न भगतसिंगांना मिळाला नाही, आण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. आम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.