गुन्हा दाखल करून फडणवीसांना अटक करा, रुपाली चाकणकर यांची मागणी
!['Even if he apologizes, action will be taken against the rebellious Karadkars'; Women's Commission directs police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/rupali-chakankar.jpg)
पुणे – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला होता. त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशभरातील 16 निर्यातदारांकडे 20 लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पडून आहेत. पण ही इंजेक्शन्स महाराष्ट्राला विकू नयेत, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप (BJP) विरोधी पक्षात असूनही ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर (remdesivir injection) देऊ शकते, हे सिद्ध करण्यासाठीच या कंपन्यांवर दबाव आणला जात आहे. ही सगळी परिस्थिती पाहता भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे कारस्थान आखले आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिव्हीरचा साठा विकत घेतात. त्या कंपन्या हा साठा परस्पर उपलब्ध करुन देतात हा अपराधच आहे. पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागले. भाजपने हा रेमडेसिव्हीरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा राज्य सरकारला का मिळू नये?
केंद्राचा चाप लागल्याशिवाय फार्मा कंपन्या अपराध करायला प्रवृत्त होणार नाहीत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या मालकाच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? अशावेळी विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱ्या फार्मा कंपनीची वकिली करत आहेत. हे असे महाराष्ट्रात यापूर्वी कधीही घडले नव्हते, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.