#AnilDeshmukh: “मी तर तेव्हाच म्हणालो होतो, हा नियोजित कट आहे!”, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप!
![“बाहेर बघितलं की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत”, हसन मुश्रीफ यांनी सांगितला सत्तास्थापनेवेळचा किस्सा!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/hasan-mushrif-on-cbi-raid-at-anil-deshmukh-house-in-mumbai.jpg)
मुंबई |
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळपासून सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर सीबीआयनं हा तपास हाती घेतला असून त्याअनुषंगाने हे छापे टाकण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच, अजूनही अँटिलिया प्रकरणाचा छडा का लागला नाही? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
फडणवीस, परमबीर सिंगांनी शहांची भेट घेतली आणि…
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. “ज्या दिवशी परमबीर सिंह यांचं पत्र प्रसिद्ध झालं, तेव्हाच मी म्हणालो होतो की हा नियोजित कट आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीरसिंग दिल्लीत गेले. पहाटे अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणं म्हणजे भाजपानं विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेलं कट-कारस्थान आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही”, असं ते म्हणाले.
वाचा- राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं