१०० कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच अनिल देशमुखांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय होणार निर्णय?
मुंबई |
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अनिल देशमुख यांनी सध्या अटकेत असणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपांनंतर राज्यात खळबळ माजली असून यानंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी एक तास ही बैठक सुरु होती. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून त्याच्या एक दिवस आधीच ही भेट झाली आहे. परमबीर सिंह यांचं पत्र तसंच फोन टॅपिंग प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपानंतर पहिल्यांदाच बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय़ घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. दुसरीकडे परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मौन बाळगलं आहे.
वाचा- जेजुरीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची सुटका