‘अजितदादा शब्दाला पक्के’, कार्यकर्त्यांनीही विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करावे’; श्रीरंग बारणे
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी महायुतीला शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी, असा सल्ला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.
हेही वाचा – ‘मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत…’; फडणवीसांचा मोठा आरोप
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कार्याध्यक्ष श्याम लांडे तसेच प्रशांत शितोळे, संतोष बारणे, फजल शेख, महमंदभाई पानसरे, शेखर काटे, कविता अल्हाट, वैशाली काळभोर, नारायण बहिरवाडे, वर्षा जगताप, श्रीधर वाल्हेकर, विशाल वाकडकर, गोरक्ष लोखंडे, विशाल काळभोर, कैलास बारणे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, शमीम पठाण, विनोद नढे आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार पुढील दहा ते पंधरा वर्षे राहणार असल्यामुळे अजितदादांनी योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला आहे. अजितदादांनी मावळात प्रामाणिकपणे राष्ट्रवादीची ताकद माझ्या पाठीशी उभी केली आहे. आम्हा दोघांमध्ये खूप चांगला समन्वय आहे. मावळात माझा विजय निश्चित आहे. मावळातील प्रत्येक घडामोडीवर अजितदादा व पार्थ पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणता कार्यकर्ता वेगळा विचार करीत असेल तर त्याने फेरविचार करावा. विजयी होणाऱ्या उमेदवाराची साथ देणे कधीही फायद्याचे ठरते. त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे काम करण्यास प्राधान्य द्या.