‘राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी’; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
![Ajit Pawar said that we are part of the government as a nationalist party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-2-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे बहुसंख्य आमदार सहभागी झालो आहोत. त्यानुसार मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक राज्याच वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधकांच्या बैठकीतून आऊटपुट निघत नाही.
भारतात खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही तसा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीसांचं सरकार काम करत होतं. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. वर्धापन दिनी मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं, केंद्राचा अधिकाधिक निधी महाराष्ट्रासाठी आणणं आणि सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. बहुतेक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पुढच्या सर्व निवडणुका पक्षाच्या नाव व चिन्हाखाली लढवणार आहोत. त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – ‘पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना’; अजित पवारांच्या बंडानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
आम्ही जर शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, तर आम्ही भाजपाबरोबरही जाऊ शकतो. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही इथेही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो, असंही अजित पवार म्हणाले.
केंद्रात मोदीच निवडून येणार असं शरद पवार म्हणाले – छगन भुजबळ
आम्ही महाआघाडीचा तिसरा घटक म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सहभागी झालो आहे. इतक्या दिवसांपासून चर्चा चालू होती. राज्यातले प्रश्न सोडवायचे असतील, तर सकारात्मक काम करणं गरजेचं आहे हे ओळखून आम्ही हा निर्णय घेतला. मोदींवर अनेकदा आम्ही टीका केली, पण आज ते मजबूतपणे देशाचं नेतृत्व करतायत हे नाकारता येत नाही. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला सांगितलं की २०२४मध्ये देशात मोदी सरकारच येणार नाही. असं असेल, तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे, सरकारची मदत घेतली पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे शासनात जाऊन लोकांची कामं करण्याला आमचं प्राधान्य असेल, असं छगन भुजबळ म्हणाले.