“राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे”; अजित पवारांची मागणी
![Ajit Pawar said that the budget session should take at least five weeks to do justice to the issues in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-7-780x470.jpg)
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करावे
मुंबई : नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. तसेच विधिमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, असं अजित पवार म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची घोषणा केली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे, अजित पवार म्हणाले.
दरम्यान, २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. ८ मार्चला राज्याचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे.