‘लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही’; अजित पवारांचं सूचक विधान
![Ajit Pawar said that even Brahma cannot tell what will happen in the Lok Sabha elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Ajit-Pawar-3-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीचा निकाल आता ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक विधान केलं. लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांनी केलेलं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
अजित पवार म्हणाले की, आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो. तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या. शिवसेनेला ठोका. महाविकास आघाडीत एकत्र असताना. मग मी त्यांना विचारायचो का? तर ते म्हणायचे की, शिवसेनेला ठोकल्यावर (टोकाची भूमिका घेतल्यावर) अल्पसंख्यांकाना समाधान मिळतं, म्हणजे हे शिवसेनेला विरोध करतात. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक शिवसेनेसोबत (ठाकरे गटासोबत) जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही.
हेही वाचा – डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार
बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असं काही वातावरण गावात पाहायला मिळालं. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसतो आहोत. ज्यावेळी आपण महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मानतो. त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढे जातो. आता शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीसंदर्भात छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, आपण सरकारमध्ये असेपर्यंत तसं काहीही होऊ देणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.
एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार? असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.