अजित पवार महायुतीत, भाजपमध्ये अस्वस्थता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, अजित पवारांसह महत्वाचे नेते महायुतीत
![Ajit, Party, Sharad Pawar, Answer,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/sharad-pawar-3-1-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार परत आले तर त्यांना जागा देणार का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ‘ घरात सर्वांनाच जागा आहे. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार.’ असे म्हणत शरद पवार यांनी हा विषय संपवला. त्यामुळे भविष्यात अजित पवारांची कधी घरवापसी झाली तरी त्यांना पक्षात पुनर्प्रवेश आणि तेच स्थान मिळेल की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. अजित पवार हे कुटुंबाचा भाग असले तरी पक्षाच्या कठीण काळात साथ दिली त्यांच्याशी चर्चा करूनच पक्षाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी या उत्तरातून स्पष्ट केलं.
वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि अजित पवारांसह पक्षातील अनेक महत्वाचे नेते महायुतीत गेले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. ही भूमिका फक्त राजकीय असती तर ठीक होतं, पण ते तेवढ्यापुरतचं राहिलं नाही, आणि सुरू झाले वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे राष्ट्रवादीतले अनेक ज्येष्ठ नेतेही बाहेर पडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही बारामतीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं केलं आणि पवार वि. पवार असा सामना रंगला. लोकसभेत अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नाही आणि अनेक नेत्यांची घरवापसी ( शरद पवार गट ) सुरू झाली. छगन भुजबळ हेही महायुतीत खुश नसल्याचे, त्यांचा कोंडमारा होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत . त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली असून ते परत आले तर त्यांना जागा देणार का असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
घरातील उमेदवार असूनही सुप्रियाला मतदान होईल हे मला कळलं..
बारामती आहे. तिथे लोक काम करणारचं. बारामतीतील लोक त्यांच्याशी तुमचा वर्षानुवर्षाचा संवाद कसा आहे. हे महत्त्वाचं आहे. या निवडणुकीतच नाही तर अनेक निवडणुकीत त्या मतदारसंघात मी फॉर्म भरायला जायचो. शेवटच्या सभेला जायचो. बाकीचा प्रचार करायला मी कधी गेलो नाही, यावेळचा अपवाद सोडला तर. त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे. लोकांशी पर्सनल संवाद ठेवला तर… पूर्वी ५० टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. मतदार आल्यावर त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखतो. हा जनरेशन गॅप आहे. पण हा संवाद ठेवला तर लोक विसरत नाही.
मी मुख्यमंत्री होतो. चिठ्ठी आली. एकबाई आली. तिला म्हटलं काय सुमन काय चाललं. ती गावात गेल्यावर काम होवो ना होवो पण साहेबांनी मला नावाने हाक मारली.हे ती सांगते. लोक हा सुसंवाद विसरत नाही. मला खात्री होती की सुप्रियाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. घरातील उमेदवार असूनही सुप्रियाला मतदान होईल हे मला कळलं.
राज ठाकरेंवर साधला निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केले. राज ठाकरे नेहमी टीका करतात. ते आठ पंधरा दिवसाने जेव्हा जागे होताता, तेव्हा टीका करतात, अशा शब्दांत त्यांनी टोला हाणला. अजित पवार महायुतीत आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून फिरत आहेत. त्याकडे कसं बघता, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. मात्र ‘ तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे.