…तर ईडीला जिल्ह्याबाहेर काढू; ‘जरंडेश्वर’वरील कारवाईनंतर राष्ट्रवादी दिवसेंदिवस आक्रमक
![After the action on 'Jarandeshwar', the NCP is becoming more and more aggressive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/तर-ईडीला-जिल्ह्याबाहेर-काढू-जरंडेश्वरवरील-कारवाईनंतर-राष्ट्रवादी-दिवसेंदिवस-आक्रमक-.jpg)
सातारा: कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना कोणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई लढूच, पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्ह्याबाहेर काढण्याचं काम ऊस उत्पादक शेतकरी करतील,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. ‘वडूज’ येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ईडीने राजकीय द्वेषापोटी जरंडेश्वर साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईचा निषेध केला. यावेळी शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधला.
जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयानं जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. तसंच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर देऊर येथील मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
‘ईडीला जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे, ती करावी. त्यातून सत्य समोर येईलच, पण कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद ठेवू नये. ‘जरंडेश्वर कारखाना ही जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. १५ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करणाऱ्या हा कारखाना सातारा जिल्ह्यातील तब्बल ५० हजार शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आहे. जिल्हा बँकेला सात कोटींचा फायदा मिळवून देणारा हा कारखाना आहे. ऊसाला उत्तम देणारा आणि कामगारांचे पगार वेळेवर देणारा हा कारखाना आहे. अनेकांचे संसार उभे करणारा हा कारखाना राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिंदे यांनी दिला.