‘सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे काँग्रेसचा पराभव’; काँग्रेस नेत्यांचा घरचा आहेर
![Acharya Pramod Krishnam said that Congress was defeated due to opposition to Sanatan Dharma](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Rahul-Gandhi-and-Sonia-Gandhi-780x470.jpg)
Acharya Pramod Krishnam : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने सनातन धर्मावर टीका करून चूक केली, असं त्यांनी म्हटलं आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, हा काँग्रेसचा पराभव नाही. हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारांचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला महात्मा गांधींच्या रस्त्यावरून हटवून वामपंथी मार्गावर नेत आहेत. काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करत इथपर्यंत पोहोचला आहे. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधतला पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे.
हेही वाचा – इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली!
#WATCH | On Congress trailing in MP, Rajasthan and Chhattisgarh, party leader Acharya Pramod Krishnam says, "Opposing Sanatan (Dharma) has sunk the party. This country has never accepted caste-based politics…This is the curse of opposing Sanatan (Dharma)." pic.twitter.com/rertLLlzMS
— ANI (@ANI) December 3, 2023
काँग्रेसने अशा वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. काँग्रेसला महात्मा गांधी, पंडीत नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची काँग्रेस राहू द्यावे लागेल. काँग्रेसला मार्क्सच्या विचारांवर जे नेते नेऊ पाहत आहेत. त्यांना लवकर बाजूला करावे लागेल, असं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.
भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माचा विरोधामुळे आमचा पक्ष बुडाला. जातीवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही. ६ सप्टेंबर १९९० रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहीजे. हा देश जर जातीयवादी असता तर माजी पंतप्रधान व्हिपी सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून जातीचे कार्ड खेळले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीवादी नाही. पण त्यांची अवस्था काय झाली? हे देशाने पाहिले. आम्ही सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे पराभूत झालो, हे तथ्य आहे. ज्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यातील प्रभारींनी त्वरीत राजीनामा द्यावा. जर त्यांच्यात लाज उरली असेल तर त्यांनी स्वत:हून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. काँग्रेसला सनातनचा शाप लागला, असंही आचार्य कृष्णम म्हणाले.