विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द ः जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबन
![Abusive words against the President: Jayant Patil's suspension till the winter session](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Jayatn-Patil-768x470.png)
नागपूर ः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज दिशा सालियन मृत्यू प्रकरण, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकणावरून चांगलेच तापले आहे. यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने सभागृहाचे कामकाज जवळपास 6 वेळा तहकूब करण्यात आले, याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या रागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ज्यानंतर आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सुरु असेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यानंतर सत्ताधारी बाकावरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत या अधिवेशनापूर्त जयंत पाटील यांना निलंबित केले आहे. यादरम्यान गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यात 22 डिसेंबरला शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी बिहार पोलिसांच्या चौकशीचा दाखला देत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले, या प्रकरणाचे पडसाद आज राज्यविधिमंडळाच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणीची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली. या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत शाब्दिक खडाजंगीदेखील झाली. मात्र ही मागणी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असे जाहीर केले. उपमुख्यमंत्र्यांनी दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा करताच शिवसेनेचा ठाकरे गट अधिक आक्रमक झाला होता.
नेमकं घडल तरी काय?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत बोलू देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली आहे. यावर विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार तुम्हाला संधी दिली होती, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यानंतर विरोधीपक्ष नेते आक्रमक झाल्याचे दिसले, सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली तर विरोधी बाकावरून एका सदस्स्याला बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी य़ावेळी करण्यात आली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील चांगलेच संतापल्याचे दिसले. यावेळी रागाच्या भरात तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असं जयंत पाटील यांनी म्हटले. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती.