महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांचा आकडा वाढला
मुंबई : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने काल (16 एप्रिल) गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. हा सोहळा नवी मुंबई येथे पार पडला. मात्र या कार्यक्रमानंतर एक दुःखद घटना घडली आहे. कार्यक्रमानंतर उष्माघाताने तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत.
तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आजारी पडलेल्यांची भेट घेतली. ‘हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं ते महाराष्ट्राला पाहायला मिळालं. अजूनही एक्झॅक्ट किती लोकं मृत्यूमुखी पडले हा आकडा पुढे येत नाहीये.
मात्र मृतांच्या आकड्याबाबत सरकार वस्तूस्थिती सांगत नाही. आम्ही कोरोनातही आकडे लपवले नाहीत. उन्हाळ्यात भरदुपारची वेळ निवडणं आयोजकांचं चुकलं अशी संतापजनक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
उष्माघाताने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र २० जणांवर अजुनही उपचार सुरु असून ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.