सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG_20200801_112559.jpg)
मुंबई: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून गेलेले आहे. बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या राजकारणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपला फटकारून काढलेले आहे. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
तसंच, ‘या प्रकरणी पुरावे हे महत्त्वाचे आहे. जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे दिलेच पाहिजे. दोषींची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, पण या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये वाद निर्माण करण्यासासाठी करू नका’ असंही उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना बजावलेलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे स्पष्ट केले होते की, ‘या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही कारण तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत.’ त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादामध्ये उडी घेतलेली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे. पण, राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केलेली होती. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केलेली होती.