“सुधारित नागरिकत्व कायदाविरोधात सुरू असलेली आंदोलनं राज्यघटनाविरोधी”- माधव भंडारी
“सुधारित नागरिकत्व कायदा (सिटीझन्स अॅमेंडमेंट अॅक्ट – सीएए) संसदेत संमत झालेला असून राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात कोणत्याही राज्याला, मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र भूमिका घेता येणार नाही. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेली आंदोलने आणि भूमिका देशाच्या राज्यघटनेच्या विरोधात आहे,” अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.
भारत सरकारने दोन महिन्यांपूर्वी लागू केलेल्या एनआरसी, सीएए कायद्याच्या समर्थनार्थ सावंतवाडी शहरातील नागरिकांनी धार्मिक संघटनांच्या उपस्थितीत हातात तिरंगा घेऊन सावंतवाडी शहरात रॅली काढली. त्यानंतर भाजपा प्रवक्ते भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बॅ. नाथ पै सभागृहात मार्गदर्शन सभा झाली. या वेळी ते म्हणाले की, “भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये काँग्रेसने आपल्या राजवटीत तब्बल सहा वेळा दुरुस्ती केली आहे. मुळात हा कायदा प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आणला, तर आता गाजत असलेला राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हा मुद्दा हेही काँग्रेसचेच अपत्य आहे. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एनआरसी, सीएए हे कायदे देशातील लोकांना विस्थापित करण्यासाठी नव्हे, तर अफगाणिस्तान, बंगलादेश आणि पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी केला आहे. राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार—खासदारांनी या कायद्याला विरोध करण्यापूर्वी आपण घेतलेली संविधानाची शपथ वाचावी,” असं भंडारी म्हणाले आहेत.